चंद्रयान 3 नंतर आता सूर्याकडे झेपावले आदित्य L-1
आदित्य L-1:- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रांगत राहिलेला हा प्रग्यान रोव्हर आणि त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला जवळपास १४ दिवसांसाठी थोपटून झोपविण्यात आले. त्याच दिवशी ( भारतीय अंतराळ संशोधन संस्था ) इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ हे यान सूर्याकडे रवाना केले. अंतराळात जवळपास ३ तीन महिने प्रवास करून १५ लाख किलोमीटर अंतरावरील असलेल्या लॅग्रांज-१ नावाच्या या विस्मयकारक ठिकाणी हे यान १२५ दिवसांनी पोहोचेल असे सांगितले जाते.
पृथ्वीपासून सूर्याचे अंतर जवळपास १५ कोटी किलोमीटर असल्याने तिथूनही सूर्य खूप लांब आहे. तरी सुद्धा या ठिकाणाचे फायदे असे आहेत की पृथ्वी व सूर्य या दोन्हींची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना या बिंदूवर निरस्त करत असल्यामुळे कोणतीही वस्तू एका ठिकाणी स्थिर राहील. शिवाय, सूर्याच्या निरीक्षणात ग्रहण किंवा अन्य कोणतेही अडथळे येणार नाहीत.
सूर्य कधीच आदित्य एल-१ च्या नजरेआड होऊ शकणार नाही. सूर्याच्या तापमानातील चढ-उतार, वादळे, व सौरवारे, चुंबकीय लहरी आदींचा अभ्यास या यानावरील जवळपास सात उपकरणे पुढची पाच-दहा वर्षे करत राहील.
महत्वाचे म्हणजे पृथ्वीवरील हवामानावर बरे- वाईट परिणाम घडविणाऱ्या, नैसर्गिक संकटे आणणाऱ्या, सौरवादळांची आगाऊ सूचना काही तास अगोदरच मिळेल. कारण प्रकाशवर्षांच्या गणिताने एल-१ या ठिकाणापासून पृथ्वीचे अंतर अवघे पाच प्रकाश सेकंद आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे ( सोहो यान) तिथे आदित्यची प्रतीक्षा करत असेल. ही वेधशाळा तिथे जवळपास १९९६ पासून कार्यरत आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा या ठिकाणहून आदित्य एल-१ ( Aditya L1) घेऊन निघालेल्या पीएसलव्ही अग्निबाण उड्डाणाच्या निमित्ताने इस्रोच्या या गगनभरारीच्या तपशिलात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. त्यांची पुनरुक्ती करण्यापेक्षा इतकेच म्हणता येईल, की या ब्रह्मांडाच्या पोकळीत कोट्यवधी किलोमीटरच्या अंतरावर पोहोचण्याचे तंत्र व विज्ञान भारताने पूर्णपणे आत्मसात केले याबद्दल हे शिक्कामोर्तब आहे. सुरुवातीला भारत त्यात थोडा मागे होता; परंतु, चंद्रयान- ३ ( Chandrayan-3) च्या रूपाने जे इतरांना जमले नाही ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रमला उतरवून ती पिछाडी भारताने सव्याज भरून काढली. त्या यशाने आत्मविश्वास आणि उत्साह कित्येक पटीने वाढलेल्या शास्त्र-तंत्रज्ञांनी सूर्यावरील मोहिमेचा मुहूर्त काढला होता.
चंद्रयान-३(Chandrayan 3) व आदित्य एल-१ ( Aditya L1) या दोन यशस्वी मोहिमांचा वेगळ्या अंगाने विचार करायला हवा. विशेषतः ग्रहदशा किंवा ग्रहदोष त्यासारख्या अवैज्ञानिक गोष्टींमध्ये अडकून पडलेल्या या भारतीयांच्या दृष्टिकोनात बदल होईल, यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. अशा लागोपाठ असणाऱ्या यशस्वी मोहिमांचा एक अप्रत्यक्ष फायदाही असू शकतो.
जगातील प्रगत व विकसित राष्ट्रांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींचा वैज्ञानिक विचार करण्याची जी स्थिती दिसते, त्याच्यामागे अशा अंतराळ किंवा सागरी मोहिमांचे मोठे योगदान आहेत. विशेषत: युरोप खंडातील देशादेशांत चालत आलेल्या शतकानुशतके सागरी मोहिमांची एक स्पर्धाच होती. पिढ्यांमागे पिढ्या अशा मोहिमांवर निघालेल्या संपूर्ण जगाने पाहिल्या. त्यातून निसर्गाचा, अवकाशाचा, व महासागराचा अभ्यास वाढला. एकेका राष्ट्राच्या जगाच्या कोनाकोपऱ्यात वसाहती तयार झाल्या. तेथील नोकऱ्यांच्या निमित्ताने शिक्षणाची दिशा बदलली गेली.
आधुनिक जगाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. तिला पुढे औद्योगिक क्रांतीचे बळ मिळाले. उद्योगांमधील रोजगाराच्या निमित्ताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धादरम्यान या दोन्ही देशांमध्ये अंतराळ मोहिमांची स्पर्धा सुरू झाली. सोव्हिएत युनियनने सुरुवातीला अमेरिकेला मागे टाकले होते.
अमेरिका इरेला पेटला आणि अंतराळ विज्ञानाबद्दल जगभर कौतुकस्पद कुतूहल निर्माण झाले. पारतंत्र्याच्या बेड्या परिश्रमाने तोडलेल्या व स्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच भूक व दारिद्र्याचा सामना करत असलेल्या भारतासारख्या गरीब देशालाही या क्षेत्रात उतरावे लागले. परंतु सुरुवातीच्या काळात फक्त अवकाश मोहिमाच नव्हे तर संरक्षण सिद्धतेसह सर्वच क्षेत्रात रशिया भारताचा साथीदार होता. आता भारत या दोन्हीही तसेच , चीन, जपान व युरोपीय संघ या महासत्तांना आव्हान देत आहे. चंद्र व सूर्याकडील मोहिमांनी त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील. नवी दालने खुली होतील. या संधींवर स्वार होण्यासाठी नवी पिढी त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतील.
आपोआप ती वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला लागतील आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकूण भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. आदित्यला शुभेच्छा देताना अशी अपेक्षा नजीकच्या भविष्यकाळात ठेवायला काही हरकत नाही.
ही पोस्ट आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन वर क्लिक करून शेअर करा...